अमलताश
अमलताश
अमलताश.
वनवास, शारदा संगीत सारखी मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती लिहिणारे लेखक प्रकाश नारायण संत (भालचंद्र दिक्षित) यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीने, सुप्रिया दीक्षित (पूर्वाश्रमीच्या सुधा नंदगडकर) यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र.
अमलताश हे एका झाडाचे हिंदी नाव आहे. त्याला मराठीमध्ये बहावा असं म्हणतात.लेखिका सुप्रिया आणि त्यांचा नवऱ्याच्या आवडीचे हे झाड. इंदिरा संत यांची हि थोरली सून. पुस्तकात सुप्रिया यांचे बालपण, तरुणपण, डॉक्टरकीचे शिक्षण, प्रकाश नारायण संत यांच्याबरोबरचे भावविश्व, त्यांचे कौटुंबिक जीवन आणि आयुष्यात आलेले चढउतार या सर्वाचा प्रवास आहे.
मला असे वाटले होते कि या सर्वाबरोबरच पुस्तकात ‘प्रकाश नारायण संत ‘ या संवेदनशील, तरल लिखाण करणाऱ्या लेखकाबद्दल थोडीफार माहिती मिळेल. त्यांचे साहित्यिकदृष्ट्या समृद्ध असलेले आयुष्य,त्यांच्या आईचे, इंदिरा संत यांचे, त्यांच्यावर कवियत्री या नात्याने झालेले संस्कार, त्यांचे लेखन कसे आकारास येत गेले किंवा या लेखकाने लिखाणाकरता काय वेगळे परिश्रम घेतो, त्यांना रोजच्या जीवनातून काय स्फूर्ती मिळते, लेखिकेचे म्हणजेच त्यांच्या पत्नीचे यामागे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष काय योगदान होते,दोघांमधले पूरक वातावरण कसे असेल इ. इ.असे काही या पुस्तकातून समजेल अश्या अपेक्षांनी मी हे पुस्तक वाचायला घेतले. परंतु या सर्व गोष्टी बद्दल फारशी माहिती या पुस्तकात मिळत नाही.
वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे, सुधा लहानपणी त्यांच्या आजोळी आई बरोबर राहत असे. आजोळ खूपच श्रीमंत होते. तिकडे त्यांची आणि त्यांच्या आईची, आईच्या आई वडिलांनी आणि भावांनी, खूपच प्रेमाने काळजी घेतली होती. सुधा प्रचंड लाडात वाढलेली होती. शाळेत हुशार होती. आईच्या दम्याच्या आजारामुळे तिने लहानपणीच डॉक्टर व्हायचे ठरवले. आणि मूळच्या अभ्यासूवृत्तीमुळे तसे होवूनही दाखवले.
पुस्तकातल्या अनेक प्रसंगातून असेल जाणवते कि सुधा लहानपणापासून महत्वाकांक्षी आणि व्यवहारी होत्या. प्रकाश नारायण संत मात्र होते कवीमनाचे आणि संवेदनशील. ते लहानपणी खूपच गरीब होते. वडील लहानपणीच गेलेले आणि आई एकटी नोकरी करणारी. सुअधा आणि प्रकाश दोघांचेही पिंड वेगळे होते.
प्रकाश आणि सुधा हे बालमित्र. बेळगावात एकत्र वाढलेले. दोघानाही लहानपणापासून वाचनाची प्रचंड हौस. पुढे प्रकाश पुण्याला जीओलॉजी शिकायला गेले आणि सुधा मुंबईला मेडिकल कॉलेज मध्ये. तिथे देखील पत्र व्यवहाराने दोघांची मैत्री कायम राहिली आणि कॉलेजचे एक वर्ष पूर्ण होताच, वयाच्या २१ व्या वर्षी प्रकाशने सुधाला लग्न करता मागणी घातली. मात्र सुधाला शिक्षण संपवणे जास्त गरजेचे वाटले. आणि इथपासून दोघांचे मन दुखावले जाण्याला सुरुवात झाली. पुढे चार वर्षांनी त्यांचे लग्न झाले.
इंदिरा संत या मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवियत्री. इंदिरा संत आणि सुधाची आई या दोघी एकाच कॉलेज मध्ये शिकवत होत्या. दोघींची वर्षानुवर्षे मैत्री होती परंतु सुधा-प्रकाश यांच्या लग्नात झालेल्या मानपानामुळे ते संबंध बिघडले आणि सुधाच्या आईने रत्नागिरीला नोकरी करायला सुरुवात केली. MBBS चे शिक्षण झाल्यावर मनात असूनही, कौटुंबिक जबाबदार्यांमुळे सुधा यांना MD करता आले नाही आणि डॉक्टरकीच्या कारकिर्दीकारता आयुष्याच्या उमेदीच्या वयात हवा तसा वेळ देता आला नाही. मात्र “सुधामुळे प्रकाशचे लिहिणे, चित्र काढणे, व्हायोलीन वाजवणे थांबले” असे ताशेरे आयुष्यभर सहन करावे लागले. जरी सुधा आणि प्रकाश कऱ्हाड ला राहत असल्याने सासू सुनेचे भावविश्व स्वतंत्र राहिले तरी आयुष्यभर अनेक समज-गैरसमजांमुळे असंतोषाचेच राहिले.
लेखिकेला नेहमीच वाईट वाटत राहिले कि तिला तिच्या लेखक नवऱ्याला वेळोवेळी भावनिक आणि मानसिक साथ देता आली नाही. लेखिकेला कित्येकदा प्रकाशचा हळवा, हळुवार स्वभाव कळायचाच नाही. कलावंत फुलून यायला भावनिक साथ तितकीच महत्वाची असते. त्या तारा कधी जुळल्याच नाहीत हा दैव दुर्विलास.
तसेच त्यांच्या दोघांच्या कौटुंबिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. एखादा चांगला प्रसंग घडला कि त्या पाठोपाठ एक वाईट प्रसंग घडयाचाच.जोडीला प्रकाश यांची तब्येतदेखील त्यांना साथ देत नसे. प्रकाश,सुधा आणि इंदिरा संत या सगळ्यांचीच तब्येत बिघडत असे .आणि त्यामुळे त्या तिघानाही वरचेवर हॉस्पिटल मध्ये रहायची वेळ आली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून प्रकाश नारायण संत आयुष्यातील ३० वर्षे काहीही लिहू शकले नाहीत.
या पुस्तकातल्या काही गोष्टीनी मात्र मला भुरळ घातली. पुस्तकाचा कालखंड अंदाजे १९४० ते २००० पर्यंतचा. तेव्हाची सामाजिक आणि कौटुंबीक जीवनपद्धती कशी होती याचे फार सुंदर चित्रण केले आहे. मोबाईल ,TV , इंटरनेट या सर्वांचे जेव्हा अस्तित्व नव्हते तेव्हा माहिती मिळवण्याची आणि करमणुकीची साधने काय होती हे वाचायला छान वाटले.आजूबाजूला घडणारी छोटो मोठी घटना पण करमणुकीचा विषय बाबत असे. झाडांचे वाढणे, बहरणे, घरातल्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळणे, निसर्गाची विविध रूपे पाहणे या गोष्टीनी रोजच्या जीवनात विरंगुळ्याचे क्षण येत असत. पत्रे पाठवणे आणि आलेली पत्रे वाचणे हा आयुष्यातील महत्वाचा भाग होता. तसेच प्रकाश नारायण संत यांना आवडणाऱ्या अभिजात रशिअन पुस्तकांचे संदर्भ, त्यातले उतारे,कोट्स यांच्या उल्लेखामुळे त्यांचा वाचनाचा व्यासंग समजून आला.
लेखिकेने अर्थातच त्यांच्या काळातले बोली भाषेतले कित्येक शब्द यात स्वाभाविकपणे वापरले आहेत जे आता आपल्याला माहित पण नाहीत..उदा.’ लसण्या ‘ नावाचा हातात घालवायचा बांगडी सारखा दागिना किंवा नाकातल्या मूगबटातला हिरा.
सगळ्यात महत्वाचे हे देखील समजले कि वनवास,शारदा संगीत मधला लंपन म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः प्रकाश नारायण संत याचे लहाणपणेचे रूप आहेत.त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी लंपन ला प्रथम एका कथेत शब्दबद्ध केले. आणि नंतर तब्बल ३० वर्ष्यांच्या खंडानंतर वयाच्या ५६व्या वर्षी त्यांनी उर्वरित कथा संग्रह लिहायला घेतला. ज्या तरलतेने त्यांनी लंपनची भावनिकता वयाच्या ५६ व्या वर्षी शब्दात पकडली आहे हे पाहून मन थक्क होते. प्रतिभा प्रतिभा कशाला म्हणतात तर याला.
वाचत असताना डॉ सुप्रियाना संसार करिता ,तडजोड करावी लागते उच्च शिक्षणाची संधी सोडावी लागते हे वाचून क्षणभर मन बैचैन होते पण हि बचैनी पुस्तक संपविताना मात्र राहत नाही ,कलासक्त सहचराला संभाळल ,व त्याचे कलागुण विकसित करायला नेहमी तत्पर राहिल्या .नाती जोडली , जोपासली सहचरा सोबत रसिकतेने जगल्या
अडचणी त्यांना जरूर आल्या त पण त्यांनी त्याचा बाउ केला नाही तर त्या सामंजस्याने सोडवल्या त्यांची हि problem solving attitude नक्कीच अनुकरणीय वाटली .म्हणून अडचणी जरी आहेत तरी असमाधान नाही ,खंत आहे पण आकांत नाही .सल आहे पण सुस्कारे नाहीत .माणसाने माणसासारखे वागावे म्हणजे आयुष्य सुंदर होते हा संदेश नकळत मिळतो अनाग्रही वृत्तीने लिहिलेले पुस्तक आहे .संपविल्याशिवाय ठेवावेसे वाटत नाही"
खूप खूप वाईट वाटत राहते कि नियतीने या लेखकाला ३० वर्ष या लेखनाच्या अभिव्यक्तीपासून दूर ठेवले.आणि ही खंत काही केल्या माझ्या मनातून पुसली जात नाही.
सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ छायाचित्र
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment