संघर्ष हेच सामर्थ्य

पाडून घेतल्या. 

रवींद्र खंदारे यांचे जीवन म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे. लेखकाचे जीवनानुभव अतिशय दाहक आहेत. संकटे आली, तरी त्यांनी हतबल होऊन शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. त्या सर्व संकटांतून तावूनसुलाखून निघाल्यामुळेच त्यांच्या जगण्याला तेज प्राप्त झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता ते झुंजत राहिले, म्हणून त्यांना ध्येयपूर्तीचा आनंद घेता आला. ह्या आत्मकथनाचे सार महात्मा फुले यांच्या 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' ह्या मूलमंत्रात समाविष्ट झाले आहे. ह्या लेखनात लेखकाचे अतिशय समंजस, समजूतदार, ध्येयनिष्ठ, सोशीक आणि सहनशील व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झाले आहे. 'संघर्ष हेच सामर्थ्य' हे केवळ व्यथावेदना मांडणारे आत्मकथन नाही, तर जीवनाभिमुखतेचा संदेश देणारे आत्मकथन आहे. किंकर्तव्यमूढ होत चाललेल्या उगवत्या पिढीला अंतर्मुख करणारे हे आत्मकथन आहे. हे ह्या कलाकृतीचे मोठे यश म्हणावे लागेल. 
ह्या आत्मकथनाची भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ, प्रवाही आणि अनलंकृत आहे. लेखकाने कुठेही शाब्दिक कसरती केलेल्या नाहीत. त्यामुळे ह्या भाषेला साधेपणातले सौंदर्य लाभले आहे. लेखकाने केलेली प्रसंगचित्रणे आणि भावचित्रणे अतिशय समृद्ध असल्यामुळे ह्या लेखनाला कमालीची वाचनीयता लाभली आहे. हे आत्मकथन वाचत असताना आपण चित्रपटच पाहतो आहोत, असे वाटते. हे संपूर्ण लेखन अतिशय उत्कटतेने आणि 'आतून' आलेले असल्यामुळे वाचक म्हणून आपण त्या जीवनसंघर्षाशी एकरूप होऊन जातो. लेखकाच्या जीवनातील दु:खाच्या प्रसंगी वाचकमनाला खिन्नता वेढून राहते. जसे आठवले तसे लिहून काढले, असे ह्या लेखनाचे सरधोपट स्वरूप आहे. सत्य सोलवटून सांगताना त्यांनी काहीही हातचे राखून ठेवलेले नाही. ह्या लेखनात कुठेही आवेश नाही किंवा अभिनिवेशही नाही. कुठेही गौरवीकरण नाही किंवा उदात्तीकरण नाही. लेखकाने मुद्दाम आपली 'छान' प्रतिमा निर्माण करण्याचा किंवा प्रतिमा जपण्याचा मुळीच प्रयत्न केलेला नाही. 

लेखकाने आपल्या लेखनावर अजिबात कारागिरी केलेली नाही. मुद्दाम कुठेही नाट्यमयता आणलेली नाही, तरीसुद्धा हे लेखन वाचकाच्या थेट काळजाला भिडते. लेखकाने आत्मकथनाची मांडणी छोट्या छोट्या २२ प्रकरणांमधून केली आहे. कच-याचे सोने, पुन्हा एक नवीन शाळा, शिक्षक भरतीची अग्निपरीक्षा, आणि पहिली सही, संधींचा स्वीकार, जावळीचे खोरे, अधु-या डावाचा पुन्हा श्रीगणेशा, जीवनाची शर्यत ही प्रकरणांची शीर्षके अतिशय अर्थपूर्ण आणि उत्कंठावर्धक आहेत. 'संघर्ष हेच सामर्थ्य' हे ह्या आत्मकथनाचे शीर्षक अतिशय अन्वर्थक आहे. लेखकाने रंगविलेल्या आई, वडील, भाऊ, बहीण, मामा, मामी, मित्र, सहकारी शिक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या व्यक्तिरेखा अतिशय ठसठशीत आहेत. आत्मकथन लेखनात जितकी समरसता असावी लागते, तितकीच तटस्थताही असावी लागते. रवींद्र खंदारे यांनी ह्या दोन्ही गोष्टींचा तोल अतिशय सहजतेने सांभाळलेला आहे. 

लेखकाच्या जीवनाविषयी आणि ह्या आत्मकथनाविषयी दोन ठळक बाबी इथे मुद्दाम नमूद केल्या पाहिजेत:

 १) लेखकाने आपल्या आयुष्यात कृतज्ञता हे मूल्य फारच जिवापाड जपले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटलेले नातेवाईक, मित्र, सहाध्यायी, शिक्षक, सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्याविषयीच्या नोंदी त्यांच्या नावानिशी कृतज्ञतापूर्वक केल्या आहेत. ही संख्या कदाचित हजारात जाईल.

२) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाची सदैव सकारात्मक जीवनदृष्टी.

कोणी कितीही वाईट वागला, तरी लेखकाने त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता त्यालाही सहानुभूतीने समजून घेतले आहे. कोणाविषयीही कटुता बाळगलेली नाही. कधीही, कुठेही, कुणावरही आदळआपट केली नाही किंवा आगपाखडही केली नाही. अनेक कडवट प्रसंगही त्यांनी सौम्य करून मांडले आहेत. ह्या संयमित लेखनशैलीला तोड नाही. अशी सकारात्मकता ही हल्ली फारच दुर्मीळ गोष्ट आहे.

हे आत्मकथन म्हणजे एक स्मरणसाखळी आहे. हे आत्मकथन म्हणजे जीवनातील भल्याबु-या अनुभवांची गोळाबेरीज आहे. ह्या आत्मकथनाच्या माध्यमातून लेखकाने आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे आत्मकथन म्हणजे लेखकाने घेतलेला स्वत्वाचा शोध आहे. लेखकाने कुठेही आत्मगौरव केलेला नाही किंवा आत्मप्रौढी मिरविली नाही. रवींद्र खंदारे जीवनसत्याला अतिशय धीटपणे सामोरे जाताना दिसतात. हे आत्मकथन कठोर वास्तवाच्या पायावर खंबीरपणे उभे आहे. लेखकाने आपल्या आयुष्याचे यथातथ्य मूल्यांकनही केले आहे. मला ह्या आत्मकथनातील वाङ्मयीन मूल्यांपेक्षा यातील कृतज्ञतामूल्य अधिक मौलिक वाटते. सतत नन्नाचा पाढा वाचणा-या नवीन पिढीसाठी हे आत्मकथन दिशादर्शक आणि अतिशय प्रेरणादायी आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने हे आत्मकथन वाचलेच पाहिजे.

लेखकाने स्वतःच्या शिक्षणाविषयी लिहिले असले, तरी शिक्षणव्यवस्थेवर फारसे भाष्य केलेले नाही. रवींद्र खंदारे लवकरच शिक्षणाधिकारी होतील. आणखी वरिष्ठ पदावर जातील. आता जेव्हा त्यांच्या आत्मकथनाचा दुसरा भाग येईल, तेव्हा त्यात शिक्षणव्यवस्थेच्या, विशेषतः प्रशासकीय यंत्रणेच्या कृष्णधवल बाजूंवर प्रकाश पडेल, अशी अपेक्षा आहे. 



 सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ छायाचित्र



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*