सुलभ मराठी व्याकरण

सुलभ  मराठी व्याकरण




अलीकडे शालेय जीवनापासूनच नवनव्या भाषा शिकण्याकडे कल दिसून येतो. त्या जरुर शिकाव्यातच; पण मातृभाषेचे काय? आपल्याच मराठी भाषेकडे दुर्लक्ष करून कसे चालेल! मराठीचे व्याकरण, शुद्धलेखन चांगले समजले, तरच अन्य भाषा आपण चांगल्या पद्धतीने आत्मसात करू. 
सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकातील ‘शब्दसिद्धी’ या महत्त्वाच्या प्रकरणातून जास्तीत जास्त तत्सम, तद्भव, देशी व परभाषीय शब्द (मुख्यतः फारसी व अरबी) विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.

मो. रा. वाळिंबे यांचे हे गाजलेले पुस्तक व्याकरण व लेखनाच्या सर्व विभागांवर अद्ययावत माहिती देते. 
माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीपूर्व,पदविका आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे हे पुस्तक आहे. 

उदाहरणे व अभ्यास याकरिता. मराठीचे सखोल ज्ञान हवे असणाऱ्या साऱ्यांसाठीच हे पुस्तक उपयुक्त आहे.


मो .रा . वाळिंबे म्हणजेच – मोरेश्वर रामचंद्र वाळिंबे .

मराठी व्याकरणाच्या अध्यापनावर प्रभुत्व असलेले व्याकरणकार मोरेश्वर रामचंद्र वाळबे यांनी ३६ वर्षे माध्यमिक शाळेमध्ये व्याकरणाचे अध्यापन केले. मराठी व इंग्रजी हे दोन्ही विषय हसत- खेळत शिकवण्यात त्यांची हातोटी होती. त्यांनी पुण्याच्या बालभारती व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामध्ये मराठीचे अधिकारी म्हणून काम केले होते.
व्याकरणाचा अभ्यासक्रम शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुगम पद्धतीने समजावा या हेतूने त्यांनी ‘सुगम मराठी व्याकरण व लेखन’ या पुस्तकाचे लेखन केले. व्याकरणासारख्या क्लिष्ट विषयातील नियम व बारकावे अतिशय सोप्या स्वरूपात यांच्याकडून उदंड स्वागत झाले.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाचे व शुद्धलेखनाचे ज्ञान व्हावे म्हणून तळमळीने ग्रंथलेखन करणारे भाषातज्ज्ञ, अनुवादक व चरित्र लेखक मोरेश्वर वाळंबे यांचे शिक्षण बी.ए.बी.टी.पर्यंत झाले.
कोल्हापूर येथे पाच वर्षे, सातारा येथे पंधरा वर्षे, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्रशाला, पुणे येथे दोन वर्षे, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे चौदा वर्षे, अशी १९३७ ते १९७३ सालापर्यंत तीन तपे शिक्षक, पर्यवेक्षक, शाळाप्रमुख म्हणून ते कार्यरत होते.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात नऊ वर्षे, मराठीचे संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने प्रसिद्ध झालेल्या मराठी शब्दकोशाचे साहाय्यक संपादकपदही त्यांनी भूषविले होते.

‘बॉर्न फ्री’ या इंग्रजी ग्रंथाचा ‘वनराणी एल्सा’ या नावाने संक्षिप्त अनुवाद करून तो ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला.‘शिकारीच्या सत्यकथा’ (१९६०) हे त्यांचे शिकारविषयक लेख असलेले पुस्तक लक्षवेधी आहे. मात्र त्यांची प्रमुख कामगिरी म्हणजे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील असा दृष्टिकोन ठेवून ‘मराठी शुद्धलेखन प्रदीप’ (१९६५), ‘मराठी व्याकरण’ (इयत्ता पाचवी ते सातवी),‘शुद्धलेखन परिचय’ (१९६५), ‘सुगम मराठी व्याकरण व लेखन’ (इयत्ता आठवी, नववी, दहावी), ‘सुगम मराठी शुद्धलेखन’ (१९७२) अशी व्याकरणविषयक व शुद्धलेखनावरची ग्रंथरचना होय.

मोरेश्वर रामचंद्र वाळंबे हे हाडाचे शिक्षक होते. त्यामुळे मराठी व्याकरणासारखा विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय सहज, सोप्या भाषेतून व उदाहरणे देऊन त्यांनी समजावून दिलेला आहे. विद्यार्थ्यांची मराठी भाषाविषयक जाणीव समृद्ध व्हावी यासाठी तळमळीने कार्य करणारा भाषातज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख कायम राहील.


– मोरेश्वर रामचंद्र वाळंबे यांच्या पुस्तकाची माहिती :
इयत्ता पाचवी ते आठवीच्या व्याकरणातील सर्व घटकांचा व शब्दसंग्रहाचा यामध्ये समावेश केला आहे.
सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.
प्रत्येक घटकातील संकल्पनांचे महत्त्वाच्या टिपांसह स्पष्टीकरणही यामध्ये दिले आहे.
विद्यार्थ्यांना सरावासाठी आदर्श सराव कृतींचा यामध्ये समावेश केला आहे.
अभ्यास कसा करावा, आदर्श उत्तरे कशी लिहावीत याविषयी महत्त्वाच्या टिपांचाही यामध्ये समावेश केला आहे.
मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून काही रंजक भाषिक खेळांचाही यामध्ये समावेश केला आहे.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय सोपा करून सांगणारे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक आहे .
 

” आपल्याला जे विचार व्यक्त करावयाचे आहेत, ते नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास आवश्यक आहे. सामान्यपणे नियम, व्याख्या, उदाहरणे, स्पष्टीकरण इत्यादी भाग आपल्याला कंटाळवाणा वाटतो, नकोसा वाटतो. तरीही व्याकरणाचा अभ्यास हा आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या भाषेचा अभ्यास असतो. आपल्या भाषेवर जसे आपले प्रेम असावे, तसेच आपल्या भाषेच्या व्याकरणावरही आपले प्रेम असावे.

व्याकरणाचा अभ्यास म्हणजे ‘लेखी भाषेचा’ किंवा ‘लेखन – स्वरूपातील भाषेचा’ व त्या भाषेच्या नियमांचा अभ्यास नाही; तर आपले बोलणे, आपले स्पष्टीकरण कौशल्य, भाषण कौशल्य यासाठीही व्याकरण आपल्याला उपयुक्त ठरते. उच्चारांतील बिनचूकपणा, नेमकेपणा, वाक्यातील शब्दांचा बिनचूक क्रम हे व्याकरणाच्या अभ्यासामुळे आपल्याला येऊ लागतात; म्हणून ‘व्याकरण’ हा विषय विद्यार्थिदशेतच नव्हे, तर आजीवन आपल्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय होणे आवश्यक आहे. “– असे त्यांचे म्हणणे आहे.



सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ छायाचित्र


सौ. मनिषा राजन कडव
१६/एक, ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग-४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*