मराठीचा अभिमान आणि व्यावहारिक ओढाताण

मराठीचा अभिमान आणि व्यावहारिक ओढाताण

भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसते. तर तो सर्वात मोठा आधार असतो. आज मराठी राजभाषा गौरव दिनाच्यानिमित्ताने राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम होतील. मराठी भाषेच्या संवर्धनाकरीता घोषणा होतील. आणाभाकाही घेतल्या जातील. ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजांच्या स्मृत्यर्थ २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी दिन म्हणूनही साजरा होतो. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. त्या मायमराठीवर अविरत प्रेमवर्षाव करण्याकरीता मराठी मन नेहमीच उत्सुक असते. त्याला काही उपक्रमांची जोड दिली तर त्या उत्साहात थोडी भर पडते. हा दिवस साजरा करण्यामागचा खरे तर प्रमुख उद्देश हाच आहे की मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे. ती टिकली पाहिजे. यात काही शंका नाही. परंतु त्याच्या पुढचा टप्पा संवर्धनाचा असतो. संवर्धनामध्ये अधिक श्रम, अधिक आत्मियता, किंबहुना अधिक शाश्वतताही असते. म्हणूनच मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करीत असताना तिच्या संवर्धनाचे काय असा प्रश्न नकळतपणे उभा राहातो. खरे तर साहित्य संमेलन किंवा वेगळ्या अशा मातृदिनाच्या निमित्तानेसुध्दा हा विषय चर्चेला येत असतो. ज्यामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. असा आपण अनेक वर्षे आग्रह धरत आहोत. शिवाय लोकव्यवहार, राज्यकारभार यामध्येसुध्दा मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा अशी त्यामागची भूमिका आहे. मात्र आज संवर्धनाचे हे प्रयत्न आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते. अगदी स्पष्ट सांगायचे तर आम्हाला मराठीचा अभिमान बाळगायचा आहे पण आपल्या वैयक्तिक आणि राजदरबारी तिचा सन्मान राहील असे काहीच करायचे नसते. व्यावहारिक पातळीवरची ही ओढाताण पाहिल्यानंतर केवळ एखादा दिवस साजरा करून तिचा गौरव आपल्याला सिध्द करता येणार नाही हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही अभिमानासाठी समर्पणाची तयारी ठेवावी लागते. तशी आज दिसत नाही.


वस्तुस्थिती खूप वेगळी 


भाषेविषयीची ही पोटतिडीक, आस्था, किंवा
ज्याला आपण खऱ्या अथनि कळकळ किंवा तळमळ म्हणू. ती संघटितपणे, एकत्रितपणे सगळ्यांमधून व्यक्त व्हायला हवी. म्हणजे मातृभाषेतूनच शिक्षण घेण्याचा आग्रह धरण्यापासून ते कटाक्षाने आपल्याच राज्यात आपल्याच लोकांशी बोलताना अधिकाधिक शुध्द मराठी बोलण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. ते होत नाही आणि आपल्या बोलण्यामध्येच नकळतपणे हिंदी, इंग्रजी भाषेची घुसखोरी सहजपणे होऊन जाते. आजचे युग स्पर्धात्मक आहे. आणि जगभर इंग्रजीचा डंका पिटला जात असल्याने केवळ मराठीला कवटाळून आमचे कोणते भले होणार आहे अशा प्रकारचा मुर्दाडपणा हा या मातृभाषेला सन्मान देऊ शकत नाही. सुरेश भटांसारखा कवी ज्यावेळेला तळमळीने असं म्हणतो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य एकतो मराठी। परंतु याच्याच पुढची ओळ अधिक महत्त्वाची म्हणायला हवी. एवढ्या जगात माय मानतो मराठी। असा जर भाषेविषयीचा कडवा दृष्टीकोन असेल तरच इतर भाषा शिकूनही मराठीविषयीची आस्था टिकून राहू शकते. ज्या कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्ताने हा दिवस साजरा होतो. त्यांच्याविषयीचीसुध्दा माहिती पुरेशा प्रमाणात शाळाशाळांमधून किंवा संस्थागत पातळीवर दिली जात नाही. महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यकार, नाटककार, थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेल्या कुसुमाग्रजांनी मातृभाषेची ही अवस्था पाहून एकेकाळी असे म्हटले होते की माझी ही मायमराठी मंत्रालयाच्या दारापाशी गुलाम होऊन पडलेली आहे. कारण राज्यव्यवहारामध्ये मराठीलाच दुय्यम स्थान मिळत होते आणि मराठीच्या संवर्धनासाठी कोणतेच उपक्रमही केले जात नव्हते. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राटासारखे अविस्मरणीय नाटक ज्यांनी लिहीले ज्यातून मराठी भाषेबरोबरच मराठमोळ्या स्वभावाची वैशिष्टये रेखाटली गेली. या दिवसाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांच्या कार्याविषयीचा आदर तर व्यक्त होतोच. परंतु मराठीच्या संवर्धनाकरीता किती ठोस पावले पुढे पडली याचासुध्दा मागोवा घेतला गेला पाहिजे. केवळ त्या दिवसापुरता भाषेविषयीचा उमाळा दाखवून चालणार नाही. तर व्यक्तिगत आणि व्यावहारिक पातळीवर या मायमराठीची सेवाही घडावी लागेल. या भाषेला

केवळ लटके समाधान

अभिजातपणाचा दर्जा मिळो ना मिळो. नऊशे हजार वर्षे जुनी असलेली ही भाषा अभिजातपणाच्या शिफारशीवर मोठी होणारी नाही. ती अभिजनांची भाषा असल्याने तिचा रात्रंदिवस वापर होणे हाच तिचा खऱ्या अथनि सन्मान ठरू शकतो आज गावोगावी नजर टाकली तर मराठी शाळा बंद पडत आहेत. आंतरराष्ट्रीयतेच्या नावाखाली मराठी माणसाच्या मानगुटीवर इंग्रजीचे भूत थैमान घालते आहे. घराघरांमधून मम्मी, डॅडी, पप्पा इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष संवादांमध्ये इंग्रजीचा टेंभा मिरवला जातो. आणि मराठी बोलणान्याला नकळतपणे दुय्यम ठरवले जाते. इंग्रजी शिकलात तरच प्रगती आहे असे सातत्याने बिंबवून आणि तसाच संस्कार घडवून आजची पिढी मोठी होते आहे. तिला मराठी फक्त घरात थोडावेळ बोलण्याची भाषा एवढाच तिचा परिचय राहिलेला आहे. ज्यावेळी कटाक्षाने मराठीतून शिक्षण आणि इंग्रजी भाषेत नैपुण्य ही स्थिती निर्माण होईल त्यावेळी मराठी भाषेचा केवळ गौरव नाही तर ती खऱ्या अथनि गुणमंडित होईल. आज सर्वत्र जी परिस्थिती दिसते आहे त्याचे वर्णन करायचे झाले तर मराठीचा अभिमान पण व्यावहारिक ओढाताण असा प्रकार आढळून येतो आणि मग प्राप्त परिस्थितीत मानून घ्यायचे लटके समाधान असेदेखील चित्र समोर येते. या बेगडी अभिमानामध्ये आपण मराठी भाषेला न्याय देत नाही.आपणच आपल्या मातृभाषेवर अन्याय करतो हे सातत्याने लक्षात ठेवण्याची गरज आहे.




सौ. मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*